शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

तुक्याचं लगीन

 दोन पोरींच्या पाटीवर ताईबाईला नवस करुन झालेल्या तुक्याला उद्या पोरगी बगायला जायचं, म्हणून सजा म्हातारीच्या पायाला पाय नव्हता. चाळीशी पार केलेला तुक्या बिनलग्नाचा हुता. दिसच तसं आल्यातं. त्याला कोणी काय करणार? प्रत्येक पोरीला शहरात राहणारा आणि नुकरीवाला पोरगा पाईजी असतुया. शेतकऱ्याला आणि रोजगारीनं जाणाऱ्याला कोण लागलं म्होरं हुन पुरगी द्यायला.

पण जवापासून मान भागात आपल्या बिदागीरीची पोरं आहे आणि जमण्यासारखं आहे आसं जवा तिच्या लांबच्या भावाकडनं समजलं तवापासुन सजा म्हातारी सगळ्या काळ्या मळ्यात फिरून सांगून आली. उद्या आपणास माझ्या तुक्याला पोरगी बगायला जायच आहे म्हणून. सजा म्हातारीची ही धावपळ व गडबड बगुन कमला म्हातारी बोलली, सकाळी उगवत्या दिसाकडं तोंड करून गाडी हलवा. आदीच लय विघ्न आलेत. कमला म्हातारीचं ही शब्द ऐकून सजा म्हातारी जाग्यावर थांबली. कारण तिजा बेत हुता मोटारसायकल वरती जायाचं. पण कमला म्हातारी म्हणली. चांगल व्हान करून जावा. म्हंजी पाव्हण्याला पण बरं वाटल आणि तीच म्हणाली वरच्या आळीच्या पकाचं डमडम आहे बग. त्याला इचार आणि जावा त्यात.

कमला म्हातारी बोललेलं ऐकून, त्याच इचारात सजा म्हातारी वरच्या गल्लीत पोचली आणि पका टमटम वाल्याच घर जवळ केलं. पका तात्यानं इचारलं, का आलतीस आज घरला? आय रानात गेल्या संद्याकाळी तु ये. सजा म्हातारी बोलली, नाय तुझ्याकडं आली हुती. पकातात्या म्हणाला, माझ्याकड? काय काम काढल आज म्हातारीनं? त्याला इचारलं, कासारवाडीला किती पैकं लागतील जायला? आपल्याला तिकडं उद्या जायचं आहे. डमडमवाला पका हसून म्हणाला, काय… तुक्याच लगीन ठरलं की काय? म्हातारी त्याला म्हणाली नाय ठरण्यासारखं हाय. बघायला जायच हाय. त्येचं एकदा तांदूळ पडलं की, मी म्हातारी मोकळी झाली बघ. आरं तुझ्याच वार्गीचा माझा तुक्या. आता तुझी थोरली पोरं लग्नाला आली आन माझ्या तुक्याच अजून लगीन नाय. बघ! उद्या येशील नवं? पका तात्या म्हणला, येईन की. आवरा तुमचं. आन २६५० रुपय भाडं हुतंय बघ. पैशाचा आकडा ऐकून सजा म्हातारीच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ही एवढं पैक आनि इतर खरच म्हणल की पाच हजारच तोंड बघावं लागत हुतं. पोराच्या सुखासाठी काहीतरी करायला पायजी, ही भावना ठेऊन ती म्हणली, 'ये बाबा करती कायतरी. पैशासाठी काय करायचं या इचारात सजा म्हातारी काळा मळा जवळ करत हुती.

वस्तीवर आल्यावर ती लिंबाखाली बसली व पैशाचा विचार करायला लागली. इचार करत असताना तिला बाजूच्या कुडाच्या मेडीला बांधलेली गाबनी शेळी दिसली. तिच्याच शेजारी शेवरी खाताना तान्ही पाट दिसली. उद्याच्या खर्चासाठी ही पाट विकायचं व पैशाची जोडणा करायची या इचारानं शेजारच्या वकील बापूला सांगितलं, ही पाट न्या व मला सात एक हजार द्या. वकील बापुनं सहा हजाराला व्यवहार ठरवला. सजा म्हातारीला फक्त आपल्याला लेकाचा सुख दिसत होत बाकी काहीच नाही. सजा म्हातारीनं सगळ्यांना सांगून झाल्यावर ती रोजगार हमीच्या कामावर गेलेल्या तुक्याची वाट पाहत बसली हुती. तीनं तुक्याची इजार शर्ट निरम्यात घालून स्वच्छ धुन ठिवली हुती. म्हातारी तुक्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत हुती आणि कधी एकदा दिस उजडतोय असे तिला झालं हुतं. ह्यो इचार करत असताना तुक्या सायकलवरनं आला. तो उतरतो नाही तोपरेंत म्हातारीनं त्याला ही बातमी सांगितली. आपल्या आईचा आनंद पाहून आपल उद्या जमतंय की काय असेच तुक्याला वाटलं. उद्या लवकर उठायचं म्हणून त्यो लवकर झोपी गेला. सकाळी कोंबडा आरवायच्या आत सजा म्हातारी उठली. कुडाच्या एका बाजूला बांधलेली शेळी बाहेर नेऊन कोंबड्याच्या मोठला बांधली. कोंबड्या सोडल्या व हापशावरून पानी आणून तवलीत तापायला ठेवलं. पाणी तापवत असताना तुक्याला हाक दिऊन उठवलं व त्येच्या हातात बाटलीतील कोळशाची मिसरी दिली आणि आवरायला सांगितलं.

सूर्य कूस बाहेर काडतुय तोपरेंत म्हातारीनं संपूर्ण मळ्याला येडा आणला आवरा म्हणून. लांबचा पल्ला हाय, आवरा लवकर, अस सर्वाना सांगत होती. बगता बगता पका तात्या डमडम घेऊन दारात आला. त्याच्या मधी त्यानं वाकळ टाकली व आवरा लवकर निगूया म्हणून हाक द्यायला लागला. सजा म्हातारीनं ठिवणीतलं लुगडं नेसायला काढलं हुतं. कंबरला पैक खवलं व ती डमडमकड निघाली. एव्हाना सगळी जाणारी माणसं गाडीत बसली हुती. तुक्या आवरून गाडीत बसला हुता. एवढ्यात पुतळा म्हातारी बोलली वटीत घालाय केळाची फणी घेतली का?तुक्या म्हणला, 'नाही राहिल्या डालत तशीच. आता आणतू म्हणून उतरायला लागला. तेवढ्यात सदा नाना म्हणला तु कशाला उतरतोय आता? चालत्या गाडीला नाट लावायला. हे शब्द ऐकताच सजा म्हातारी ओशाळली. तरीपण चला आवरा म्हणून गाडीला बटन दाबलं. गाडी जोमानं निगाली. मजल दरमजल करत कासारवाडी जवळ करत चालली, प्रवासात असताना अनेक जुन्या गोष्टीना उभाळा मिळत होता. गप्पा गोष्टी रंगात आल्या होत्या आनि मध्येच ज्ञानू आबा म्हणाला तुक्याचा बा केरबा असता म्हंजे लय बरं झालं असतं बघा. आपल्या धन्याच नाव काढल्यावर सजा म्हातारीला चर्रर्रर्र झाल आणि त्यो जीवनातला काळा दिस तसाच दिसू लागला.

तीस वर्षाच्या पाठीमागची ही गोष्ट तवा तुका लहानच होता त्याला घेऊन सजा म्हातारी आणि तीझा मालक केराप्प दादा उसतोडणीला गेली होती, गावातील अजून हातावर पोट असणारी बरीच लोक हुती सोबत, सगळी एका जीवान राहत हुती, कारखाना ज्या बाजूला हाय त्या बाजूला सगळी पाल मारून आभाळाच्या छताखाली राहत हुती. सजा म्हातारी व केराप्प दादा उस भरणीला असायची, कारण केराप्प दादा भरणीला लय ताट गडी. असाच एके दिवशी उस भरून घेऊन जात असताना वगळाटीकडला ट्रॅक्टर घसरला व केराप्प दादा त्या उसाखाली घावला व जीव गुदमरून गेला , सजा म्हातारीनं तो प्रसंग बगुन हंबरडा फोडला पण नशिबाचा फासाच त्या दिवशी उलटा होता त्याला कोण काय करणार , तेव्हाचा दिस आणि आजचा दिस आहे तसाच आहे. सजा म्हातारी सर्व प्रसंग आठवून आतल्या आत तिची घालमेल होत होती. आये बोल की गप का हायच म्हणल्यावर सजा म्हातारी भानावर आली . एव्हाना कासारवाडी ही जवळ आली होती .

कासारवाडीच्या आल्याड सजा म्हातारीच भाव हुबा हुता. त्याला बगुन गाडी थांबवली. कारण त्यानच ही स्थळ काढलं होतं. बोलता बोलता गाडी कासारवाडीच्या पाव्हण्याच्या दारात आली. पोरीच्या बापानं राम राम घातला व पाणी देऊन आत बसायला बोलावलं. सजा म्हातारी बैचेन होती. काय हुतय, कसं हुतंय म्हणून. मनोमन देवाला प्रार्थना करत हुती माझ्या लेकाचा एवढं जमुदि.

च्यापाणी झाल्यावर मुलगीला बाहेर बोलावलं आणि पोरीला पाहून कमला म्हातारी म्हणली, पाठ जरा वरतं सार. तुळईखाली येतूय आणि उजवा पाय टाकून पाठावर बस. तिला बसलेली पाहून सजा म्हातारीला इतर बायका म्हणल्या, पोरगी एक नंबर हाय. आता फक्त जमायला पाईजी. तेवढ्यात मुलीच्या बापानं तुक्याला इचारलं. काम काय करता? तुक्या म्हणला, रोजगारीनं जातूय सडकंवर कामाला. आन पाटलाचं श्यात हाय, तित बी जातूय, काम नसल्यावर. हे ऐकताच पाठावर बसलेल्या पोरीचा चेहरा पडला आनि तो क्षण काय सजा म्हातारीच्या नजरतनं सुटला नाय. थोडया वेळानं सजा म्हातारीच्या भावाला पाव्हण्यानं बाहेर बोलावून नेलं व कायतरी कानात सांगितलं. सजा म्हातारीचा जीव मात्र खाली वर होत हुता. सगळा कार्यक्रम झाल्यावर गाडी पुन्हा आहे त्या मार्गानं निघाली. थोडया अंतरावर आल्यावर पका तात्यांनं इचारलं, काय म्हणलं मगाशी पाव्हनं?ओशाळलेल्या आवाजात तुक्याचा मामा म्हणला, ही राहिली आपण दुसरी बघू पोरगी. हे शब्द ऐकताच सजा म्हातारी गपचिप बसली. तीनं सगळं काही समजून घेतलं हुत. ही बी हातचं पाव्हणं जात्यात ही म्हातारीनं वळखलं होतं.

दिवस मावळतीकड झुकत हुता आणि आभाळ मोठ्यानं गरजत हुतं. गावाकडच्या बाजूला धो धो पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट चालू हुता. शेळ्यामेंढ्याचा आवाज येत हुता. सजा म्हातारीला काही सुचत नव्हतं. गपचिप टिकून बसली हुती.

कमला म्हातारी, सजा म्हातारीला बोलली, घर आलं उतर आता. एकीकडं पका तात्या गाडीच भाडं मागत हुता. सजा म्हातारी भानावर आली आणि बाहेर बगती तर एक मेड मूडली हूती छपराची लावलेली. शेवरीची बंदाटी उडून गेली होती. निम्मा कुड ढासळला हुता. शेळीनं खुट्टा उपसून हैदुस घातला हूता. कारण तान्ही पाट वकील बापू सोडून घीऊन गेला हुता. कंबरेच पैकां काडून देताना सजा म्हातारीला एकच विचार येत हुता माझ्या तुक्याच्या नशिबात तांदूळ धरलं आहे की नाही, याच इचारात ती खाली उतरत होती. आहे त्या परिस्थितीमध्ये मायलेकरं घरात आली त्या दिवशी उपाशीच झोपली.

हा प्रसंग होऊन आता दोन महिन हुन गेलं हुत, तुक्या नेहमीप्रमाण कामावर जात हुता. गावातील त्याच्या वारगिची किंवा मोठी लोक बोलावून घ्यायची व मी तुला एक पोरगी बघितल्या म्हणायची. लग्नाचा विषय काढला की तुक्या ही आनंदी होयचा आणि तितच बैठक मांडायचा आणि समोरचा माणूस मात्र निर्दयी होऊन त्याच्याकडून लाकडं फोडून घ्यायचा व इतर ही काम करुन घ्यायचा. कोण आपल्या शेताला पाणी पाजून घ्यायच तर कोण खात टाकून घ्यायच सगळ्यां निर्दयी लोकांना तुक्या बिनपगारी गडी मिळायचा आणि संध्याकाळी घरी सांगत यायचा आये आमुक गावाला पाव्हणं आहेत म्हणून सांगितलं आहे. आजकाल लहान पोरं ही सायकलवरून जाताना त्याला म्हणतात, ये तुक्या लगीन कधी रं तुझं? समद्या गावाचं लहान थोराचा चेष्टचा विषय म्हंजे 'तुक्याच लगीन' झालं आहे. तुक्याच्या आईला सजा म्हातारीला हे सर्व समजत हुतं. पण हे सर्व तुक्याला समजतं असेल? का त्याला समजूनच घ्यायच नसेल हे त्या देवालाच माहिती. सजा म्हातारी मात्र नेहमी याच विचारात असते. माझ्या तुक्याच कसं होणार … माझ्या तुक्याच कसं होणार.


ग्रामीण कथालेखक : समाधान कोळेकर
मार्गदर्शक :दाजी कोळेकर

आरेवाडी ( 7798965801)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...